Saturday 14 February 2015

पाऊस, मी... व हरवलेली ती...

त्या दिवशी पहाटे पासूनच सतत पाउस पडत होता. जाग येताच खिडकीच्या बाहेर पाहिले तर पावसाच्या सरी वाऱ्यावर आरूढ होऊन एकामेकींना अगदी चिटकून वाहत असतांना दिसत होत्या. पावसाचं आणि तुझं फार जवळचं नातं आहे हे तुला ही निट ठाऊक असावं, नाही का? त्यामुळे साहजिकच त्या पावसाला पाहून तुझी आठवण आली. वाटलं २ मिनिट का होईना पण आज तुला कसे ही करून भेटायचे. मागे आलेल्या वादळामुळे आठवणींवर खूप धूळ जमा झाली होती. तुला भेटून आणि तुझ्या सोबत थोडं भिजून सर्व जुन्या आठवणींना स्वच्छ धूऊन काढायचं होतं.

तुला फोन लावला. तू म्हणालीस की आज संध्याकाळी तुला मला भेटणं शक्य नाही कारण तुला काही कामा निमित्ताने ऑफिस नंतर बाहेर जायचं आहे आणि तुला घरी परतायला उशीर होणार आहे. मी म्हटलं होतं " किती ही उशीर होऊ दे तरी चालेल फक्त तू  २ मिनिट तरी भेट ". शेवटी माझ्या आग्रहा पुढे तुला हात टेकवावे लागलेत आणि नाही तरी खूप महिन्यांनंतर मी कोणता तरी हट्ट करत होतो हे तुला ही माहित होतं. रात्री बरोबर ९ वाजता ठाणे स्टेशनच्या ब्रिज वर भेट असं तू म्हणाली होतीस. तुझा होकार मिळताच मी खिडकी बाहेर हात काढून पाउसाच्या पाण्यासोबत खेळू लागलो. पाउस दिवस भर चालूच होता. मनात म्हटलं बाबा रे असाच पड दिवस भर.

त्या दिवशी ऑफिसची सर्व कामे आधीच उरकून घेतली आणि बरोबर ८. ३० वाजता ठाणे स्टेशनच्या ब्रिज वर पोहोचलो. एरवी तुला भेटतांना कधीच Punctual नसणारा मी त्या दिवशी अर्धा तास आधी जाऊन पोहोचलो होतो. तुला फोन केला तर तू कळवलं की तुला दादरहून फास्ट लोकल नाही मिळाली म्हणून तू स्लो लोकल ने येत आहेस आणि त्यामुळे तुला उशीर होणार थोडा. म्हटलं ठिक आहे तू ये सांभाळून. अनोळखी स्टेशन आणि अनोळखी ब्रिज. ९. ३० झालेत तरी तुझा काही पत्ता नव्हता. तुझी वाट पाहत पाहत मी थकलो आणि माझ्या सोबत पाऊस ही थकला. तो अचानक पडायचा थांबला. वाटलं आपला plan पूर्ण फ्लॉप होतांना दिसत आहे पाउस ऐन वेळी दगा देत आहे. आता कसं काय तुझ्या सोबत पाउसात भिजणार? त्या ब्रिज वर पार कंटाळून गेलो होतो असं वाटत होतं कधी तू येशील आणि कधी तुला भेटेन मी. त्या स्टेशन वर काढलेला एक तास मला एक वर्षा प्रमाणे भासत होता. अखेर तू आलीस. लांबूनच ब्रिज उतरतांना दिसलीस. किती तरी महिन्यांनतर तुला प्रथमच पाहत होतो मी. तू भेटलीस. २ मिनिट आपण एकमेकांची विचारपूस करू लागलो आणि तेव्हा लगेच बोलता बोलता तू तुझं लग्न ठरण्याची बातमी मला दिलीस. तेव्हा ऐकाएकी थांबलेला  पाउस पुन्हा सुरु झाला. मुसळधार नव्हे पण छान रिम-झिम असा पाऊस पुन्हा सुरु झाला... स्ट्रीट लाईट्सच्या प्रकाशामध्ये फार सुंदर वाटत होते पाऊसाचे थेंब तुझ्या गालांवर आणि पावसाच्या पाण्याच्या पार तू पाहिले होतेस का माझ्या डोळ्यांमधून वाहणारे अश्रू?


"चल, येते मी आधीच खूप उशीर झाला आहे"... असं म्हणत तू तिथून निघाली होतीस.. पण मी काही क्षण तिथेच पावसात भिजत रेंगाळत उभा राहिलो होतो वर आभाळाकडे पाहत.. तू नाही पलटून पाहिलस... थोड्या वेळाने मी परत घरी जाण्यासाठी लोकल पकडली होती आणि तू एक नवी वाट पकडून कायमची गेली होतीस..

त्या दिवसा नंतर आजवर किती तरी उन्हाळे गेलेत पण तरी तो दिवस आजही माझ्या आठवणींच्या गाठोड्यामध्ये तसाच ओला आहे हे तुला ठाऊक आहे का ?
- हर्ष
(एक काल्पनिक कथा....)

2 comments:

  1. अप्रतिम ... अगदी जिवंत भाव-भावनांचे चित्र रेखाटन ....काल्पनिक न वाटण्या इतके अचूक !!!

    ReplyDelete
  2. पाऊस आणि प्रेम ह्यांचे एक वेगळेच नाते आहे …
    खूप सुंदर आणि भावपूर्ण मांडणी …
    डोळ्यांसमोर कथा उभी राहिली...
    अप्रतिम !!!

    ReplyDelete